मुंबई प्रतिनिधी
मुंबईतील बांद्रा येथील सेंट अँड्र्यूज कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना प्राचार्या डॉ. सिबिल थॉमस यांच्यामुळे प्रचंड मानसिक छळ सहन करावा लागत आहे आणि अत्यंत प्रतिकूल वातावरणात काम करावे लागत आहे. त्यांनी निर्माण केलेल्या दहशतीच्या वातावरणामुळे काही कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. त्यांच्या सततच्या अपमानास्पद आणि तुच्छतादर्शक वर्तनामुळे काही कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी राजीनामे दिले आहेत.
प्राचार्यांकडून कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना देण्यात येणाऱ्या छळाची यादी खालील प्रमाणे आहे:
*1) तोंडी शिवीगाळ:*
त्या नियमितपणे अपमानास्पद आणि तुच्छ भाषेत शिक्षकांचा अपमान करतात.
*2) बदनामी:*
कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांविरुद्ध त्या खोटे आणि निराधार आरोप करतात.
*3) MEPS नियमावली 1981 चा भंग:*
त्यांनी महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी नियमावली 1981 मधील नियमाचा भंग करीत एकतर्फी महाविद्यालयाची वेळ सकाळी 11:00 ते संध्याकाळी 6:00 पर्यंत वाढवली आहे, नियमानुसार शिक्षकांना साप्ताहिक घड्याळी 30 तासाच्या सेवेची तरतूद आहे. येथे रोज सात तासांची सक्ती केली जाते.
*4) मानसिक छळ व त्यामुळे राजीनामा*
शिक्षकांना मानसिक छळ सहन करावा लागतो, काही शिक्षकांनी आपल्या सेवेचा राजीनामा सुद्धा दिला आहे.
*5) डॉक्टरांकडून मानसोपचार :*
सुमारे 4 ते 5 शिक्षक प्राचार्यांकडून होणाऱ्या मानसिक छळामुळे मानसोपचारतज्ञाकडून उपचार घेत आहेत.
*6) धमकी :*
त्या कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना कामाच्या वेळेनंतरही काम करण्यास भाग पाडतात आणि त्यांना सातत्याने वेतन, वेतनवाढी, निवृत्तीवेतन रोखण्याची धमकी देतात.
*7) आत्महत्येचे प्रयत्न:*
प्राचार्यांकडून झालेल्या प्रचंड मानसिक छळामुळे दोन शिक्षकांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.
*8) जास्त वेळ थांबण्याचा दबाव:*
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना कामाच्या वेळेनंतरही महाविद्यालयात थांबण्यास भाग पाडले जाते.
*9) उपप्राचार्य नाहीत:*
त्यांनी आजपर्यंत उपप्राचार्याची नियुक्ती केलेली नाही.
*10) सक्तीचे BLO कर्तव्य:*
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना बी एल ओ च्या कामाची सूट असली तरीही त्यांना बी एल ओ कामाची सक्ती केली जाते
अशाप्रकारे शिक्षकांचा छळ करणाऱ्या आणि महाविद्यालयात प्रतिकूल असे दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या प्राचार्या डॉ. सिबिल थॉमस यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच सदर महाविद्यालयातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना सौहार्दपूर्ण आणि सुरक्षित कामाचे वातावरण उपलब्ध करून देण्यात यावे, अशी विनंती मुंबई कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष प्रा एस एल दीक्षित यांनी मुंबईचे शिक्षण उपसंचालक माननीय श्री राजेश कंकाळ यांना पत्र लिहून केलेली आहे. त्याची प्रत संस्थेच्या विश्वस्त अॅनिसेटो परेरा यांनाही दिलेली आहे. या कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षकांना नियमानुसार अद्ययावत सेवा पुस्तके दिली जात नाहीत, वरिष्ठ तसेच निवड श्रेणी दिली जात नाही, सेवा जेष्ठता यादी ठेवली जात नाही. येथे शिक्षकांवर एवढी दहशत आहे की ते समोर येऊन तक्रार करण्यास तयार होत नाहीत. या प्राचार्यांनी चालवलेला कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा छळ थांबवण्यात आला नाही तर त्या विरोधात संघटनेला आंदोलन हाती घ्यावी लागेल, आवश्यकतेनुसार अशा प्रकारचा गुन्हा थांबवण्यासाठी पोलिसांचीही मदत घ्यावी लागेल असे संघटनेचे सरचिटणीस प्रा मुकुंद आंधळकर यांनी कळविले आहे.




