केतन खेडेकर
‘व्हीबी-जी राम जी’ योजनेच्या अंमलबजावणीदरम्यान येणाऱ्या अडचणींचा आढावा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत ‘व्हीबी-जी राम जी’ या नवीन योजनेच्या अंमलबजावणीमध्ये शासन पातळीपासून गाव पातळीपर्यंतच्या संपूर्ण यंत्रणेने सतर्कता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व राखावे. यंत्रणेचा कोणत्याही स्तरावर गैरफायदा घेतला जाणार नाही, याची दक्षता घेऊन योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. सर्व यंत्रणांना या योजनेची सविस्तर माहिती होण्यासाठी विभागनिहाय कार्यशाळा आयोजित करण्याचे निर्देश दिले.
योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभाच्या कामांना प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या. तसेच प्रशासकीय त्रुटींमुळे मजुरांची देणी थकणार नाहीत, यासाठी संबंधित यंत्रणांनी विशेष दक्षता घ्यावी, असे स्पष्ट केले. कामांना केंद्र शासनाची मान्यता मिळाल्यानंतर निधी हस्तांतरण व व्यवस्थापनाशी संबंधित प्रक्रिया विहित कालावधीत आणि पूर्ण पारदर्शकतेने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. योजनेअंतर्गत हाती घेतलेल्या सर्व कामांची उपयोगिता प्रमाणपत्रे वेळेत सादर करावीत तसेच प्रत्येक कामाचा संबंधित यंत्रणांनी नियमित आढावा घ्यावा, असेही निर्देश दिले.
योजनेची माहिती सर्व संबंधित घटकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचावी यासाठी पहिल्या टप्प्यात पुढील महिन्यात विभागनिहाय कार्यशाळांचे आयोजन करण्यात यावे, ज्यामध्ये संबंधित यंत्रणा, गावपातळीवरील लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांचा सहभाग असणार आहे. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात जिल्हास्तरावर अशा कार्यशाळा आयोजित करण्यात याव्यात, असेही सांगितले.
यासोबतच, कोकण विभागाची भौगोलिक परिस्थिती आणि स्थानिक गरजा लक्षात घेऊन योजनेतील कामांच्या स्वरूपात आवश्यक ते अनुषंगिक बदल करण्याबाबतही बैठकीत सविस्तर चर्चा झाली. योजनेची अंमलबजावणी स्थानिक परिस्थितीनुसार अधिक परिणामकारक होईल, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना सर्व संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत.
या बैठकीस रोजगार हमी योजना विभागाचे सचिव अप्पासो धुळाज, आयुक्त श्रीमती अनिता मेश्राम, सहसचिव अतुल कोदे यांच्यासह विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.





