मुंबई प्रतिनिधी: पावसाळ्याच्या प्रारंभानंतर जिल्ह्यात सर्पदर्शन व सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी, साप दिसल्यास घाबरून न जाता अथवा त्याला मारण्याचा प्रयत्न न करता तात्काळ प्रशिक्षित सर्पमित्र किंवा वन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा परिषद ठाणे प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
पावसाळ्यात वाढलेली आर्द्रता, प्रजननाचा हंगाम आणि बिळांमध्ये साचणारे पाणी यामुळे साप मानवी वस्तीकडे व घरांच्या परिसरात येण्याचे प्रमाण वाढते. विशेषतः ग्रामीण भागात शेत, अंगणे, गोठे, लाकडांचे ढीग, कचऱ्याचे साठे आणि झुडपे असलेल्या ठिकाणी नागरिकांनी अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे.
जिल्हा परिषद प्रशासनाने नागरिकांना पुढील प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे :
• घराच्या परिसरात झुडपे, लाकडांचे ढीग व कचरा साचू देऊ नये.
• उंदीर व बेडूक यांसारख्या सापांच्या खाद्य प्राण्यांची संख्या वाढणार नाही, यासाठी परिसर स्वच्छ ठेवावा.
• घराबाहेर ठेवलेले बूट, चप्पल वापरण्यापूर्वी नीट तपासून घ्यावेत.
• घरातील अंधारे कोपरे, स्टोअररूम, रॅक व गोदामे नियमित स्वच्छ ठेवावीत.
• रात्रीच्या वेळी बाहेर पडताना टॉर्चचा वापर करावा.
• शेतात किंवा पाणथळ भागात काम करताना पायात बूट व संरक्षणात्मक साधनांचा वापर करावा.
• सापाला दगड मारणे, काठीने हाणणे किंवा पकडण्याचा प्रयत्न करू नये. त्यामुळे साप स्वसंरक्षणासाठी हल्ला करू शकतो.
• साप दिसल्यास किमान ८ ते १० फूट अंतर राखून सुरक्षित ठिकाणी थांबावे आणि प्रशिक्षित सर्पमित्रांना पाचारण करावे.
• जमिनीवर न झोपता पलंगावर अथवा उंचीवर झोपावे
सर्पदंश झाल्यास कोणतेही घरगुती उपचार, जखम कापणे, विष शोषण्याचा प्रयत्न करणे किंवा घट्ट बांधणे टाळावे. रुग्णाला शांत ठेवून तात्काळ जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रात किंवा रुग्णालयात दाखल करावे. जिल्ह्यातील शासकीय आरोग्य संस्थांमध्ये सर्पदंशावरील उपचार व आवश्यक प्रतिविष (Anti Snake Venom) उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी दिली आहे.
“पावसाळ्यात सर्पदर्शनाच्या घटना वाढतात. नागरिकांनी अफवा व भीतीला बळी न पडता वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारावा. साप दिसल्यास त्याला इजा न करता प्रशिक्षित सर्पमित्र किंवा वन विभागाशी संपर्क साधावा. सर्पदंश झाल्यास त्वरित शासकीय आरोग्य संस्थेत उपचार घेणे हेच सर्वात प्रभावी व सुरक्षित पाऊल आहे.” – जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव
जिल्हा परिषद प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहून स्वतःची आणि वन्यजीवांची सुरक्षितता जपण्याचे आवाहन केले आहे.





