मुंबई प्रतिनिधी:
“कोंबडीला खुराड्यात कोंडावे, तशी आमची अवस्था झाली होती,” अशा शब्दांत आज मुंबई मेट्रो-३ (आक्वा लाईन) मध्ये अडकलेल्या प्रवाशांनी आपल्या संतापाची भावना व्यक्त केली. आज दुपारी १२:४५ वाजता धारावी स्थानकावरून सुरू झालेला प्रवास चर्चगेट (मंत्रालय) पर्यंत पोहोचण्यासाठी प्रवाशांना अक्षरश: दोन तास लागले, ज्यातील सव्वा तास मेट्रो बोगद्यातच ठप्प होती. भुयारी मार्गावर मोबाईल नेटवर्क नसल्याने प्रवासी बाह्य जगापासून पूर्णपणे तुटले होते. श्वास कोंडणाऱ्या वातावरणात मेट्रो प्रशासनाचे मौन आणि कर्मचाऱ्यांची प्रवाशांप्रती असलेली बेजबाबदार वागणूक यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला होता.
तांत्रिक बिघाडामुळे मेट्रो थांबल्यानंतर प्रवाशांना मदत करण्याऐवजी मेट्रो कर्मचारी उलट अंगावर धावून जात असल्याचे धक्कादायक चित्र पाहायला मिळाले. मेट्रोच्या वायरलेस यंत्रणेवर ‘कोणी मीडियाचा माणूस आहे का किंवा व्हिडिओ काढत आहे का,’ अशी विचारणा वारंवार होत असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेपेक्षा प्रशासनाला आपली प्रतिमा वाचवण्याची जास्त चिंता असल्याचे स्पष्ट झाले. विशेषतः धारावी मेट्रो स्थानकावर झीशान नावाच्या दिव्यांग प्रवाशाने ऑनलाईन तिकीट काढूनही, त्याला मदत मिळण्याऐवजी महिला कर्मचाऱ्याच्या उद्धटपणाला सामोरे जावे लागले. या भुयारी मार्गावर अडकल्यानंतर रुग्ण किंवा वयोवृद्ध प्रवाशांची स्थिती काय होत असेल, याचा विचारही प्रशासन करताना दिसत नाही.
एकीकडे प्रशासकीय अनास्था तर दुसरीकडे आर्थिक फटका अशा दुहेरी संकटात प्रवाशांना सापडावे लागले. तांत्रिक अडचणींमुळे मेट्रो बंद पडूनही ऑनलाईन तिकीट काढलेल्या प्रवाशांना परतावा देण्यास प्रशासनाने साफ नकार दिला. केवळ फिजिकल तिकीट असेल तरच परतावा मिळेल, अशी आडमुठी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतल्याने प्रवाशांचा मनस्ताप वाढला. ऑक्टोबर २०२४ मध्ये सुरू झालेल्या या मेट्रो मार्गावर वारंवार उद्भवणाऱ्या तांत्रिक अडचणी आणि मागील पावसाळ्यात वरळी स्थानकात शिरलेले पाणी पाहता, येणाऱ्या काळात मुंबईकरांसाठी हा प्रवास किती सुरक्षित असेल, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. बस किंवा रेल्वे बंद पडल्यास प्रवाशांना बाहेर पडण्यासाठी मार्ग उपलब्ध असतो, परंतु मेट्रो-३ च्या बोगद्यात अडकणे म्हणजे प्रवाशांसाठी एक प्रकारे ‘डिजिटल जेल’ ठरत आहे. प्रवाशांच्या सोयीपेक्षा माहिती लपवण्यावर आणि उत्तरदायित्व टाळण्यावर मेट्रो प्रशासनाचा भर असल्याचे आजच्या घटनेवरून प्रकर्षाने जाणवले.





