डॉ अशोक बालगुडे
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुरू असलेल्या घडामोडींनी मोठी खळबळ उडवली आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटात वाढत चाललेली नाराजी, वरिष्ठ नेत्यांमधील विसंवाद आणि संघटनात्मक स्तरावर निर्माण झालेली अनिश्चितता यामुळे पक्षाच्या भवितव्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या पार्श्वभूमीवर आता थेट शरद पवार यांनी हस्तक्षेप करून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांमध्ये समन्वय साधावा, अशी मागणी काही आमदारांकडून होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
या घडामोडींमध्ये उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. पक्षातील वाढती नाराजी थांबवण्यासाठी त्यांनी कोअर कमिटीची तातडीची बैठक बोलावल्याची माहिती समोर येत आहे. पक्षातील अनेक निर्णय सध्या पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून घेतले जात असल्याचे सांगितले जाते. मात्र, या कार्यपद्धतीबाबत काही आमदार आणि पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याची चर्चा आहे. आगामी बैठकीत या नाराजीची कारणे, संवादातील तुटलेपणा आणि संघटनात्मक अडचणी यावर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे.
या संपूर्ण वादाच्या केंद्रस्थानी निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आलेली काही पत्रे असल्याचे सांगितले जाते. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून निवड झाल्यानंतर प्रफुल पटेल यांची राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी आणि सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलेल्या पत्रव्यवहारात या दोन्ही वरिष्ठ नेत्यांच्या पदांचा उल्लेख नसल्याने पक्षात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. १० मार्च आणि २९ एप्रिल रोजी पाठवलेल्या पत्रांमध्येही हीच बाब कायम राहिल्याने अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
पक्षांतर्गत सूत्रांच्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाशी संबंधित बहुतांश पत्रव्यवहार पार्थ पवार हाताळत आहेत. त्यामुळे निर्णय प्रक्रियेत काही मोजक्या व्यक्तींचा प्रभाव वाढत असल्याची भावना अनेक आमदारांमध्ये आहे. “सही सुनेत्रा पवार यांची आणि शाई पार्थ पवारांची,” अशी उपरोधिक चर्चा सध्या राजकीय वर्तुळात ऐकायला मिळते. अनुभवी नेते बाजूला पडत असल्याची भावना निर्माण झाल्यास त्याचा थेट परिणाम पक्षाच्या संघटनात्मक ताकदीवर होऊ शकतो, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेसमधील नव्या प्रवेशांबाबत फारसा उत्साह नसल्याचे संकेत आधीच मिळाले आहेत. त्यामुळे राजकीय पर्याय मर्यादित होत चालल्याने काही आमदार अधिकच अस्वस्थ झाले आहेत. परिणामी, पक्षाचे संस्थापक शरद पवार यांनी स्वतः पुढाकार घेऊन दोन्ही गटांमध्ये संवाद घडवून आणावा, अशी अपेक्षा आता उघडपणे व्यक्त होत आहे.
राजकीय दृष्टिकोनातून पाहता, राष्ट्रवादी काँग्रेससमोरील हे केवळ नेतृत्वाचे संकट नाही; तर संघटनात्मक विश्वास टिकवण्याचे मोठे आव्हान आहे. पक्षातील अनुभवी नेतृत्व, तरुण पिढीचा वाढता प्रभाव आणि सत्तेतील समतोल या तिन्ही गोष्टींमध्ये समन्वय साधण्यात नेतृत्व कितपत यशस्वी ठरते, यावर आगामी राजकारणाची दिशा अवलंबून राहणार आहे.
आजच्या घडीला राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक गरज आहे ती संवाद, संयम आणि संघटनात्मक स्पष्टतेची. अन्यथा अंतर्गत संघर्षाचे पडसाद केवळ पक्षापुरते मर्यादित न राहता महाराष्ट्राच्या सत्तासमीकरणांवरही उमटू शकतात. आगामी काही दिवसांत होणाऱ्या बैठका आणि वरिष्ठ नेत्यांची भूमिका याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.






