मुंबई प्रतिनिधी
सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिकाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव आणि ढिसाळ नियोजनामुळे राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री चांगलेच अडचणीत आले आहेत. पुण्यात नुकत्याच पार पडलेल्या ‘समरसता लोककला संमेलना’कडे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह प्रमुख मंत्र्यांनी पाठ फिरवल्याने ज्येष्ठ लोककलावंत पद्मश्री रघुवीर खेडकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. “एका महिन्याच्या आत राज्यस्तरीय लोककला संमेलन आयोजित केले नाही, तर मी माझा पद्मश्री पुरस्कार परत करेन,” असा थेट इशाराच खेडकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून राज्य सरकारला दिला आहे, ज्यामुळे सांस्कृतिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
प्रमुख मंत्र्यांची संमेलनाकडे पाठ
दिनांक २८ जून २०२६ रोजी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि समरसता साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने “समरसता लोककला संमेलन २०२६” चे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, श्रीमती सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आयोजक व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्यासह पुणे जिल्ह्यातील अनेक खासदार आणि आमदार उपस्थित राहणार होते. मात्र, निमंत्रण पत्रिकेवर नावे असूनही या सर्वच मान्यवरांनी संमेलनाकडे पाठ फिरवल्याने उपस्थित लोककलावंतांमध्ये तीव्र असंतोष पसरला. गेल्या दोन दिवसांपासून अनेक कलावंतांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शासनाविरोधात तिखट प्रतिक्रिया दिल्या आहेत.
अधिकाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव आणि गैरव्यवस्थापन
या संपूर्ण संमेलनात सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिकाऱ्यांमधील नियोजनातील त्रुटी, संवादाचा अभाव आणि व्यवस्थापनातील विस्कळीतपणा प्रकर्षाने समोर आला. कोणती व्ही.आय.पी. मंडळी येणार किंवा नाही, याची कोणतीही अधिकृत माहिती अधिकाऱ्यांनी स्पष्ट केली नाही. अधिकाऱ्यांच्या या मनमानी आणि ढिसाळ कारभारामुळे अखेर राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांना लोककलावंतांच्या प्रचंड नाराजीला सामोरे जावे लागले आहे.
स्थानिक कलावंतांना डावलले; पत्रकार परिषदेलाही फाटा
एका बाजूला राज्यस्तरीय संमेलनाचा गाजावाजा होत असताना, दुसरीकडे पुणे जिल्ह्यातील अनेक नामांकित लोककलावंतांना आणि अभ्यासकांना साधे निमंत्रणही देण्यात आले नाही. त्यामुळे स्थानिक कलावंतांनी सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या अधिकाऱ्यांकडे आपली नाराजी व्यक्त केली.
मुळात कोणत्याही राज्यस्तरीय संमेलनाची व्याप्ती मोठी असते. संमेलनाध्यक्ष कोण, राज्यभरातून किती कलावंत येणार, याची माहिती आयोजकांकडून पत्रकार परिषद घेऊन जाहीर करणे अपेक्षित असते. परंतु, या संमेलनाच्या बाबतीत असा कोणताही शिष्टाचार सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून पाळला गेला नाही. अधिकाऱ्यांच्या या ‘सावळागोंधळा’ कारभारामुळे निर्माण झालेला हा वाद आता मुख्यमंत्र्यांच्या दारात पोहोचण्याची शक्यता आहे.मात्र सांस्कृतिक कार्य विभागाच्या बेजबाबदार कारभारामुळे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार मात्र चांगलेच अडचणीत आले आहे.





