Tamil Nadu Politics: तमिळनाडूतील सत्ता स्थापनेचा पेच अखेर पाच दिवसांनी सुटला आहे. टीव्हीकेचे प्रमुख विजय यांनी राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यांदा दावा राज्यपालांनी मान्य केला. विजय यांचा शपथविधी सोहळा उद्या संपन्न होईल.
चेन्नई: तमिळनाडूत थलपती विजय यांच्या सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. अभिनेते ते नेते असा प्रवास करणाऱ्या विजय यांनी शनिवारी राजभवनात जाऊन राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेतली. टीव्हीके पक्षाचे प्रमुख असलेल्या विजय यांनी राज्यपालांच्या भेटीत सत्ता स्थापनेचा दावा केला. विजय यांनी याआधी तीनवेळा राज्यपालांची भेट घेतली होती. अखेर चौथ्या भेटीत बहुमताचा पेच सुटला आहे. विजय उद्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.
तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विजय सातत्यानं राज्यपालांच्या भेटी घेत होते. पण त्यांना सत्ता स्थापनेचं आमंत्रण मिळालं नव्हतं. अखेर शनिवारी विजय सरकारचा मार्ग मोकळा झाला. यानंतर विजय राज्यपालांच्या भेटीला पोहोचले. विधानसभा निवडणुकीत १०८ जागा जिंकत विजय यांचा टीव्हीके राज्यातील सर्वात मोटा पक्ष ठरला. पण बहुमताच्या आकड्यापासून ते दूर राहिले.
तमिळनाडूत सत्ता स्थापनेसाठी ११८ आमदारांचा पाठिंबा गरजेचा आहे. टीव्हीकेनं १०८ जागा जिंकल्या. पक्षप्रमुख विजय २ मतदारसंघांतून विजयी झाले. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या विजय यांच्या पक्षाचे १०७ आमदार आहेत. यामुळे बहुमतासाठी आणखी ११ आमदारांचा पाठिंबा गरजेचा होता. काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी विजय यांना पाठिंबा दिला. या पक्षांचं एकत्रित संख्याबळ ९ इतकं आहे. यामुळे टीव्हीकेकडे ११६ आमदारांचं बळ होतं. त्यांना आणखी २ आमदारांचा पाठिंबा गरजेचा होता.
व्हीसीके पक्षानं शनिवारी संध्याकाळी त्यांची भूमिका जाहीर झाली. पक्षानं विजय यांना पाठिंबा जाहीर केला. व्हीसीकेचे २ आमदार आहेत. व्हीसीकेच्या पाठिंबा पत्रानं गेम फिरला आणि विजय यांनी बहुमताचा आकडा गाठला. यानंतर आययूएमएलनंदेखील विजय यांना समर्थन दिलं. त्यांचे २ आमदार आहेत. यामुळे विजय यांच्या समर्थक आमदारांचा आकडा १२० वर गेला आणि सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला.
तमिळनाडू विधानसभा निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढत असलेल्या विजय यांच्या पक्षानं प्रस्थापित पक्षांना धक्का देत तब्बल १०८ जागा जिंकल्या. पण बहुमतापासून त्यांचा पक्ष दूर राहिला. अखेर काँग्रेस आणि अन्य लहान पक्षांच्या साथीनं विजय यांनी बहुमतासाठी आवश्यक असलेल्या आकड्यांची जुळवाजुळव केली. अखेर पाच दिवसांनी तमिळनाडूतील सत्ता पेच संपुष्टात आला आहे.