मुंबई प्रतिनिधी
आज माझी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस, लाडके उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री मा. सुनेत्राताई पवार आणि संपूर्ण महायुती सरकारचे मनापासून आभार मानतो.
रायगड ही माझी कर्मभूमी आणि माझी मायभूमी आहे. या जिल्ह्याच्या मातीत वाढलो, इथल्या जनतेने मला प्रेम दिले, विश्वास दिला आणि लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी दिली. आज महाड-माणगाव-पोलादपूर मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून काम करत असताना संपूर्ण रायगड जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून सेवा करण्याची जबाबदारी माझ्यावर आली आहे, ही माझ्यासाठी अभिमानाची आणि तितकीच मोठी जबाबदारी आहे.
छत्रपती शिवरायांच्या पवित्र भूमीचा भूमिपुत्र आणि शिवरायांचा मावळा म्हणून रायगडच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय समोर ठेवून ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडेन. रायगडच्या प्रत्येक तालुक्याचा, प्रत्येक गावाचा आणि प्रत्येक नागरिकाचा विकास झाला पाहिजे, यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करेन.
आजपर्यंत महाड-माणगाव-पोलादपूर मतदारसंघातील जनतेने आणि माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिलेल्या माझ्या शिवसैनिकांनी मला जी साथ दिली, त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. आता हीच साथ आणि आशीर्वाद संपूर्ण रायगडच्या विकासासाठी घेऊन पुढे जायचे आहे.
माझ्यासाठी पालकमंत्रीपद हे केवळ पद नाही, तर रायगडच्या जनतेची सेवा करण्याची मोठी संधी आहे.
पदाबरोबर जबाबदारी येते आणि जबाबदारीसोबत कर्तृत्व सिद्ध करण्याची संधीही मिळते. आज रायगडच्या विकासाची ही संधी मला मिळाली आहे. या संधीचे नक्कीच सोन करेन.अशी माहिती अशी माहिती रोजगार हमी योजना मंत्री आणि नवनिर्वाचित रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी दिली.





