अशोक भेके
रिपरिप पडणाऱ्या पावसाने अचानक जोर धरला. विजांचा गडगडाट सुरू झाला. काशिनाथ आणि हौसाबाई घराच्या दारात उभे राहून पावसाचे ते अक्राळविक्राळ रूप पाहत होते. तितक्यात कानठळ्या बसवणारा एक मोठा आवाज झाला. कानात दडे बसल्यासारखे काही क्षण काहीच ऐकू येईना.
भयभीत नजरेने काशिनाथने गोठ्याकडे पाहिले आणि त्याची नजर तिथेच खिळली. गोठ्यात बांधलेले सर्जा आणि राजा… त्यापैकी राजा वीज कोसळून धारातीर्थी पडला होता.
काशिनाथने धावत जाऊन “राजा… अरे राजा!” अशी हाक मारली. पण राजा निपचित पडला होता. त्याच्यात काहीच हालचाल नव्हती. शेजारी उभा असलेला सर्जा राजाकडे रोखून पाहत होता. त्या मुक्या जनावरालाही सारं काही कळलं होतं. आपला सोबती आपल्याला सोडून गेल्याच्या दुःखाने त्याच्या डोळ्यांतून अश्रूंची बरसात सुरू झाली.
काशिनाथच्या पाठोपाठ हौसाबाई धावत आली आणि ते दृश्य पाहून तिने धाय मोकलून रडायला सुरुवात केली. शेतीसाठी दोन बैलांवरच आपला उदरनिर्वाह करणाऱ्या बळीराजाच्या घरावर जणू आभाळच कोसळले होते. मुळातच गरिबीची परिस्थिती आणि त्यात शेतीचा उजवा हात असलेला राजाच निखळून पडला होता.
हा हा म्हणता ही बातमी गावभर पसरली. मुसळधार पाऊस असूनही निपचित पडलेल्या राजाला पाहण्यासाठी लोकांची गर्दी जमली. “वाईट झालं… आता काशिनाथचं कसं होणार?” ही दबक्या आवाजातली चिंता काशिनाथ आणि हौसाबाईच्या कानावर पडायला वेळ लागला नाही.
नवा बैल विकत घ्यायला पैसे नव्हते, पण शेती केल्याशिवाय पर्यायही नव्हता. अखेर काळजावर दगड ठेवून काशिनाथने एका बाजूला सर्जाला नांगराला जुंपले आणि दुसऱ्या बाजूला स्वतःच्या पत्नीने, हौसाबाईने खांदा दिला. ती मुकाट्याने नांगर ओढू लागली. गावातील काही मुलांनी हा हृदय पिळवटून टाकणारा प्रसंग आपल्या मोबाईलमध्ये कैद केला.
लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बांबळी गावातील शेतकरी काशिनाथ गायकवाड आणि त्यांच्या पत्नी हौसाबाई गायकवाड यांचा हा संघर्षमय व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला. हा व्हिडिओ इतका प्रसिद्ध झाला की तो थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचला.
व्हिडिओ पाहून मुख्यमंत्री हळहळले. त्यांनी तात्काळ संबंधित विभागाला आदेश दिला की, काशिनाथ आणि हौसाबाई यांना त्वरित एक बैल द्यावा.
आदेशानंतर संबंधित विभाग कामाला लागला आणि त्यांनी सरकारी कामाचा एक वेगळाच नमुना दाखवला. त्यांनी काशिनाथला एका गोशाळेतून आणलेला एक आजारी, अशक्त बैल सुपूर्द केला. बिचाऱ्या काशिनाथने आहे त्या परिस्थितीतच समाधान मानले आणि मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.
पण दुर्दैव काही त्याची पाठ सोडेना. जेव्हा नव्या बैलाला सर्जासोबत नांगराला जुंपले, तेव्हा काही क्षणातच तो अशक्त बैल कोसळला. पडताना त्याने सर्जालाही खाली पाडले, त्यामुळे सर्जा देखील जखमी झाला.
या नव्या बैलाची कहाणी गावकऱ्यांना समजताच मुलांनी पुन्हा एकदा त्याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला. ही बातमी पुन्हा मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचली. आपल्याच प्रशासनाने एका गरीब शेतकऱ्याची फसवणूक केल्याचे पाहून त्यांनी तीव्र खेद व्यक्त केला.
त्यांनी पुन्हा एकदा संबंधित विभागाला कठोर आदेश दिला – यावेळी काशिनाथला त्याच्या पसंतीचा बैल रोख रक्कम देऊन बाजारातून विकत घेऊन द्यावा. यावेळी अधिकारी खडबडून जागे झाले. अखेर काशिनाथला त्याच्या मनासारखा धष्टपुष्ट बैल मिळाला.
एका गरीब शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने न्याय देण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यशस्वी झाले. शासन आणि सत्ताधारी मनापासून काम करत असतात, पण झारीतील शुक्राचार्य त्यांच्या चांगल्या कामात अडथळे कसे निर्माण करतात, हेच या घटनेतून खेदाने दिसून येते.





